बंध राखीचे..... बंध नात्यांचे....
आपल्या जन्माच्या अगोदरपासूनच आपल्या आयुष्यात विविध नात्यांचे बंध गुंफले जाऊ लागतात. आपल्या जगण्यातली विविध नाती आणि त्या नात्यांचे सप्तरंगी कंगोरे नवरसपूर्ण जगण्यासाठी, अनुभवण्यासाठी हेच रेशमी बंध कारणीभूत ठरतात. आपलं जगणं समृद्ध बनवतात.
आपल्या आयुष्यात असे काही काही दिवस येऊन जातात की, जे आपल्याला आपल्यातून नकळत दुस-या व्यक्तीच्या मनात नेऊन पोहोचवतात. त्या दिवसावर तुमचा हक्क नसतोच मुळी. तो दिवसच तुम्ही कुणाच्या तरी नावाने आयुष्यभरासाठी आगावू राखीव ठेवलेला असतो. अशात सर्वप्रथम असतो आपला स्वतःचा वाढदिवस. "वाढदिवस" हा आपला हक्काचा राखीव दिवस. नंतर लगेच क्रमांक लागतो तो रक्षाबंधन आणि भाऊबीजेचा. हा आपल्या लाडक्या बहिणीच्या नावे राखीव, मग दिवाळी पाडवा आपल्या बायकोच्या नावाने राखीव. तसे तर बायकोचा वाढदिवस, आपल्या लग्नाचा वाढदिवस असे काही अन्य दिवसही बायकोसाठी राखून ठेवावेच लागतात. किंबहुना तसे केलेत तरच, तुमची हक्काची बायको तुमच्यासाठी, वटसावित्री किंवा करवाचौथ हा दिवस राखून ठेवेल, अशी अपेक्षा तुम्ही करू शकाल.
तुम्ही तुमच्या बायकोकडून किंवा तुमची बायको तुमच्या कडून काही ना काही अपेक्षा करत असाल. पण, आपल्या भावाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ त्याच्यापर्यंत आपली राखी पोहोचवावी, म्हणून धडपडणारी व जीवाचे रान करणारी बहिण, प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच. भावाने आपल्याला काहीही नाही दिले तरी चालेल, पण फक्त मला बहिण म्हणून आणि आपल्या या वेड्या बहिणीची राखी या दोनच गोष्टी मान्य कराव्यात, म्हणून आयुष्यभर झुरणारी स्त्री ही केवळ बहीणच असू शकते. आई आपल्या मुलावर जेवढे प्रेम करते, तेवढेच प्रेम, प्रत्येक स्त्री आपल्या भावांवर, एकूणच सगळ्या भावंडांवर करत असते. म्हणूनच आई नंतर नात्यांमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो बहिणीच्या नात्याचा.
कृष्ण - सुभद्रा आणि कृष्ण - द्रौपदीच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. बहिणी-बहिणींमध्ये एकवेळ पटणार नाही. पण, बहिण- भावांमध्ये पटत नाही असे क्वचितच होते आणि त्याचे कारणही ब-याचदा समजूतदार बहिण हेच असते. आईनंतर आपल्या आयुष्यात आपल्यासाठी त्याग करणारी बहीणच असते. मोठी असेल तर ताई म्हणून आणि लहान असेल तर "बायो" म्हणून, ती आपल्या भावावर जीवापाड प्रेमाची उधळण करत राहते. भावावरील प्रेमापोटी सगळं काही हसत हसत सहन करत राहते. आईवडिलांची माया जरी मुलावर जास्त असली, तरी मुलगी कधीच त्याविषयी तक्रार करत नाही. उलट माझा भाऊ, माझा दादा, त्याचे कर्तृत्व, त्याचे यश, त्याचीच भरभराट या सर्व गोष्टींचा केवढा अभिमान तिच्या डोळ्यांत, चेह-यावर दाटून आलेला असतो, हे केवळ बघण्यासारखं सुख असतं.
मोठ्या बहिणीच्या प्रेमाची पद्धत काही औरच असते. लहान बाळाची चाहूल लागली की तिला कोण आनंद होतो. तिच्या चिमुकल्या स्वप्नांची बाग बघता बघता बहरू लागते आणि तिच्या संपूर्ण आयुष्यालाच व्यापून टाकेल, अशा एका लाईफटाईम हिरोची तिच्या आयुष्यात एन्ट्री होते. तिच्या आयुष्यात आलेला हा दुसरा पुरुष, तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो, काळजाचा तुकडा बनतो. मोठेपणी तो कितीही वाईट वागला, चुकीचा असला, बिघडला, दुरावला, कृतघ्न झाला तरीही, प्रत्येक स्त्रीला या आपल्या काळजाच्या तुकड्याला तोडून फेकून देणे कधीच शक्य होत नाही. म्हणूनच तर प्रत्येक स्त्रीचा भाऊ हा तिच्यासाठी फारच संवेदनशील विषय असतो. ती एकवेळ आपल्या आईवडिलांविषयी ऐकून घेईल पण, तिच्या भावाबद्दल जरा जरी, कुणी काही वाईट वाकडे बोलले तरी, तिला येणारा राग, तिचा संताप हा तिच्या डोळ्यांतून आग ओकत बाहेर पडतो.
मोठी बहिण ही "ताई" नसतेच, ती तर आपली छोटी आईच असते. कारण, आई आपल्याला आयुष्यभर पुरत नाही म्हणूनच तर देवाने आपल्याला आईची माया देणारी "ताई" दिलेय. मुळात ताई या शब्दातच मोठ्या बहिणीचा अर्थ सामावलेला आहे. आई नसली "तरीही आई" ती ताई. आता माझे हे विश्लेषण साहित्यिकदृष्ट्या कदाचित मूर्खपणाचे असेलही. पण, नैतिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या प्रत्येक बहिण-भावाला मात्र ते निश्चितच पटेल, असा मला ठाम विश्वास आहे. हीच मोठी बहिण "ताई" लहानपणापासून आपल्या भावाची काळजी घेते, त्याला जपते, संभाळते, त्याची सगळी कामे मुकाटपणे करते, त्याच्याशी खेळते, त्याला अभ्यासात मदत करते, सांभाळून शाळेत नेते, फिरायला नेते, घरी आणते, खाऊ घालते, झोपवते, आंघोळ घालते, कपडे धुते, आईवडिलांच्या रागापासून वाचवते, त्याचे सारे अपराध स्वतःच्या नावावर घेते, परीक्षेच्या काळात हीच ताई आपल्या लाडक्या भावासोबत अभ्यासासाठी रात्रभर जागते, त्याला नवीन वस्तू घेताना त्याच्या आवडी-निवडीची काळजी घेते, त्याच्या प्रत्येक क्षणांची साक्षीदार होण्यासाठी तिची किती धडपड चालू असते. त्याची स्विमिंगपूलमधली पहिली उडी, त्याची पहिली सायकल, त्याचे पहिले निवासी शिबीर, त्याचा दहावीचा पहिला पेपर, त्याच्या कॉलेजचा प्रवेश इथपासून ते त्याचा पहिला मोबाईल फोन, त्याचा पहिला जॉब, पहिला प्रवास, त्याला आवडणारी मुलगी, त्याचे प्रेम, त्याचे लग्न आणि बरेच काही.... ज्या ज्या घरांमध्ये अशी ताई असते, त्या त्या प्रत्येक घरातील भाऊ खरंच भाग्यवान. खरंच, अशी ताई लाभायलाही भाग्य असावे लागते.
लहान बहिणीची तर त-हाच न्यारी. दादा हा तिच्यासाठी एक कल्पवृक्षच असतो. दादा हा तिचा "बापानंतरचा बाप" असतो. आपले सर्व लाड हौसेने पुरवून घेण्यासाठीचा तिचा हक्काचा आधार असतो. तिची छोटी छोटी स्वप्ने प्रत्यक्षात उतरविणारा आणि हवे असलेले सारे हट्ट पुरविणारा, देवदूतच असतो तो, त्या छोट्याशा गोड, नाजूक परीचा. हाच दादा, तिला हसविण्यासाठी आपल्या पाठीवर घेणारा "घोडा" आणि लहानपणी तिच्या दप्तराचे ओझे घेणारा, आयुष्यभर तिच्या एका हास्यासाठी, वर्षानुवर्षे हसतमुखाने अपार कष्ट उपसणारा, तिचा लाडका "गाढव" बनतो. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी, हा दादाही आपले सर्वस्व पणाला लावतो. तिला जपतो, तिची काळजी घेतो, तिला जरासे जरी काही लागले, खरचटले की त्याचा जीव कासावीस होतो, आपल्या बहिणीला जपताना, त्याला स्वतःच्या जिवाचीही पर्वा नसते. अशा दादावर हक्काने आणि प्रेमाने आपला अधिकार सांगणारी धाकटी बहिण होणं, कुठल्या मुलीला आवडणार नाही? सिंहासारखा अभेद्य संरक्षण करणारा दादा, या लाडलीच्या प्रेमापुढे मात्र गरीब गाय होऊन जातो. त्याच्या जीवावरच "ती" वाट्टेल त्याच्याशी वाट्टेल तो पंगा घेऊ शकते. या लहान बहिणीचे प्रेम, हक्क, रुसवा, मागण्या हे सारे सारे न कुरकुरता सहन करणारा दादाच, तिचे सर्वस्व होऊन जाते.
एवढे का वाटते, प्रत्येक स्त्रीला आपल्या भावाबद्दल...? तर त्याचे कारण म्हणजे, त्या दोघांचे सहजीवन. तिचे सारे बालपण त्याच्या सहवासात गेलेले असते. लहानातल्या लहान गोष्टींपासून ते मोठ्यातल्या मोठ्या घटनेपर्यंत सारे क्षण त्यांनी एकत्रितपणे घालवलेले असतात. ज्या वयात तिला हे जग कळत असतं, त्या वयातले तिचे जगच तर तो असतो. त्या जगात, तोच तिचा आधार असतो. तिचा सवंगडी असतो, तिचा सर्वांत जवळचा सखा असतो, तिचा श्वास, तिचा विश्वास आणि तिचा ध्यास असतो. तिचे सारे विश्व त्याच्याभोवतीच तर गुंफलेले गुंतलेले असते. मग मला सांगा, अशा आपल्या साथीदाराला आयुष्यभर विसरणे, कोणत्या स्त्रीला शक्य आहे. दुस-या स्त्रीच्या स्वाधीन होताना, नेमकी हीच गोष्ट आम्हां पुरुषांना कळत नाही की, आपली बायको लग्न होऊन आपल्या आयुष्यात आलेली असली तरी, आपल्यावर आभाळमाया करणारी बहिण आणि तिच्या प्रेमाचा आपल्यावर पहिला अधिकार आहे. तसेच जी मुलगी बायको होऊन आपल्या आयुष्यात आलेय, तिचाही जीव तिच्या भावात गुंतलेला असणारच आहे. पुरुष नेमका दोन्ही बाजूने बहिण म्हणून स्त्रीला ओळखायला कमी पडतो. आपण सा-याच पुरुषांनी, सर्वप्रथम आपल्याच बहिणीला आणि नंतर आपल्या बायकोमधल्याही बहिणीला ओळखायला शिकले पाहिजे.
रक्षाबंधन आणि भाऊबीजेला म्हणूनच एवढे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नात्याची लज्जतच काही और आहे. म्हणूनच ज्यांना बहिण नाही, अशा मुलांना आणि ज्यांना भाऊ नाही, अशा मुलींना या दिवसाला त्यांच्या काळजात एक रिती रिती जागा भरावयाची असते.
अशा अपूर्ण नात्यांना या रक्षाबंधनच्या दिवशी पूर्णत्व देऊया. चला, एका तरी अशा बहिणीचा भाऊ बनूया. तिच्याकडून प्रेमाने राखी बांधून घेऊया. एकातरी भावाला राखी बांधूया. त्याला बहिणीची माया देऊ या. चला, हेच नात्यांचे रेशमी बंध जोपासूया. रक्षाबंधनाच्या या पवित्र नात्यासाठी आणि या नात्याच्या उत्सवासाठी, सर्व बहिण-भावांना मनःपूर्वक शुभेच्छा...!!!
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!
धन्यवाद.
लेखक - प्रा. गुरुराज गणेश गर्दे.
शैक्षणिक समुपदेशक, करिअर मा र्गदर्शक आणि व्याख्याता.
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.
मूळ निवास :- ८४१, दुर्गानिवास, बांदा, ता. सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग. ४१६५११.
What's Up :- 9422058288
Email :- gururajgarde@gmail.com |aar yaads@yahoo.com
Facebook Link :- www.facebook.com/ EduStudentCounselor
© शब्दरचना - प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!