स्वातंत्र्य की स्वैराचार...?
आपण स्वतंत्र झालो आहोत खरे, पण आपण खरोखरच प्रगल्भ झालो आहोत का....? मिळालेले स्वातंत्र्य आपण उपभोगत नसून ओरबाडत आहोत, असं वाटतं कधी कधी. हे जे मिळवलंय ना, ते जर योग्य पद्धतीने नाही ना टिकवले, तर आहे हेही थोड्याच दिवसांत पुनश्च एकदा गमाविण्याची पाळी लवकरच आल्यावाचून राहणार नाही.
भारतीय स्वातंत्र्यात मोलाची भूमिका बजाविणा-या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि देशभक्तांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय ते केवळ आणि केवळ उपभोगाण्यासाठीच. परंतु, "स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे," हे कदाचित आपण सारे विसरत चाललो आहोत की काय? असे वाटावे, इतकी या देशाची परिस्थिती बिकट होत चाललेली दिसून येते. "देशाने आपल्यासाठी काय केले, याहीपेक्षा आपण देशासाठी काय केले. हे तपासावे," असे सांगत, स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक ठिकाणावरून धादांत खोटे बोलणारे नेते आणि तथाकथित विचारवंत यांनी हेच वर्षानुवर्षे आपल्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करून, सोयीस्कररित्या आपापली जबाबदारी ही अलगद सर्वसामान्य नागरिकांच्या खांद्यांवर आणि समाजाच्याच अंगावर बिनदिक्कतपणे टाकून दिलेली आहे.
'जगणे आणि मरणे नेमके काय असते?,' हे कळण्यासाठी एकदातरी भारतीय सैनिकाला जवळून अनुभवले पाहिजे, त्याला जाणून, समजून उमजून घेतले पाहिजे. अशा सैनिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांना देशसेवेनंतर झगडावे लागते. 'या झगड्यापेक्षा सीमेवरची लढाई परवडली,' असे या शूर जवानांना नक्कीच वाटत असावे. जो बळीराजा सा-या देशाला अन्न देतो, त्याच बळीराजाला खायला एकवेळचे अन्न नाही. ज्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जावेत असे वाटते, त्यांनाच तर सुलतानी आणि आस्मानीही संकटांशी एकाचवेळी झुंजावे लागतेय. एसीमध्ये बसून शेतक-यांच्या प्रश्नांवर काथ्याकूट करणा-या, बळीराजाच्या आत्महत्येवर अभ्यासपूर्ण भाषण ठोकणा-या, शिवाय वर सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाची फळे चाखणा-या सुखवंतांना, या बळीराजाच्या घामाची फळे आणि अश्रूंची किंमत सहजासहजी कशी कळेल.? शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, उपेक्षित आणि आर्थिक दुर्बल घटकांना जगण्याचे तरी स्वातंत्र्य आहे का....?
आपल्या समाजाचे एक मात्र बरे आहे की, आपण चांगल्याचे श्रेय घ्यायला तत्पर असतो. पण, अपयशाचे खापर मात्र दुस-याच्या माथी मारून मोकळे होतो. आपल्या हक्कांसाठी तावातावाने बोलतो, पण कर्तव्याची जाणीव करून दिली की लगेच वरमतो. सरकारकडून, लोकप्रतिनिधींकडून खूप खूप चांगल्या अपेक्षा ठेवतो, आणि चांगल्या व्यक्तींना निवडून देण्याऐवजी मात्र, वाईट प्रवृत्तींनाच मतदान करतो. काही सुजाण आणि अतिकर्तव्यदक्ष नागरिक तर मतदानाच करत नाहीत. राजकीय व्यवस्थेवर सडकून टीका करणारे, विचार मांडणारे प्रामाणिकपणे सर्वसामान्यांसाठी लढणारेच नेमके, निवडणुकीत तोंडघशी पडतात आणि लाखो करोडोनी पैसा वाटणारे, मतदार विकत घेणारे, दहशत माजविणारे, गुंडगिरी आणि मुजोरीचे घसघशीत दागिने अंगभर घालून, उजळमाथ्याने फिरणारे दादा, भाऊ, आबा, नाना, अण्णा, तात्या, साहेब, सरकार, राजे हेच निवडून येताना दिसतात. यांनाच सत्तेत निवडून देण्याचं स्वातंत्र्य मिळालंय, नाही का आपल्याला..? स्वतःच्या घरातील कचरा बाहेर सार्वजनिक ठिकाणी नेऊन, इकडे तिकडे हळूच बघून, गपचूपपणे हातातील कच-याची प्लास्टिक पिशवी भिरकावून देताना, याच निष्क्रीय सर्वसामान्य माणसांना आपण राजकारणात मात्र ही घाण अशीच भरतोय, याची पुसटशी देखील कल्पना करता येणे शक्य आहे का.....? आपल्याला सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याचे, नाही का स्वातंत्र्य मिळालेय..?
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, घाण करणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे, भावना भडकविणा-या लोकांची गुलामगिरी करणे, अप्रामाणिकपणा अंगी बाणवणे, इतरांशी खोटेपणाने जगणे, भ्रष्टाचार, लाच देणे घेणे यांना विरोध न करता प्रोत्साहन देणे, सिग्नल न पाळणे, अपघातग्रस्तांना मदत न करणे, कामावर वेळेवर न पोहोचता, काम संपायच्या आधीच लवकर निघणे, पैशांत सा-या गोष्टींची तुलना करून दुर्बलांवर रुबाब दाखविणे, सार्वजनिक जबाबदारीच्या नावाखालीही केवळ स्वतःचीच सोय बघणे आणि निसर्गाची नि पर्यावरणाची अनन्वित हानी करणे, या आणि अशा अनेक गोष्टींचे अनिर्बंध स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे, अशीच समजूत बहुदा सा-यांची झालेली दिसतेय. मग या अशा परिस्थितीत देशसेवा नक्की कोणती करायची ? कशी करायची ? कुणी करायची ? कधी करायची ? हाच संभ्रम, या सुजाण भारतीय नागरिकांच्या मनात निर्माण होतो.
प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रांत, चढाओढ नि जीवघेणी स्पर्धा लागलेय. स्वतःच्या उत्कर्षापुढे, इतरांचा, समाजाचा, पर्यायाने देशाचा उत्कर्ष विचारात घ्यायलाही आज नेमका वेळ नाहीये या नव्या भारतीयांकडे. गलेलठ्ठ पगार, स्वतःची नोकरी, घराचे हप्ते, दोनचाकी- चारचाकी गाडीचे कर्ज, मुलांची शिक्षणे, रोजच्या खर्चाचा ताळमेळ, हॉटेलिंग, मल्टिप्लेक्समधील करमणूक आणि विकेंड सेलिब्रेशन यात गुरफटून गेलेल्या नवयुवकांच्या व्हॉटस् अप् आणि फेस्बुकात भरभरून वाहणारे देशप्रेम बघितले की वाटते, देशासाठी लढणा-या आणि अमर हुतात्म्यांना स्वतःची स्मृतीस्थळे ही पर्यटनस्थळे झालेली पहावयास मिळणे, हे किती दुर्दैवी नाही का.....?
रोज आपण आपल्या आयुष्यात साधे साधे नियम पाळून, सार्वजनिक संकेत पाळूनही देशसेवा करू शकतो, हे वेळेवर आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. घराघरांतून चालणारे टी.व्ही., केबलचे मुक्त प्रक्षेपण, कॉम्प्युटरचे वाढते अतिक्रमण, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, होळी, आपले लग्न समारंभ तसेच, एकूणच सर्व सणांचे आणि परंपरांचे सार्वजनिक बिभत्सरूप पाहता, आपल्या भावी पिढीसमोर आपण याच अराजकाचे, स्वैराचाराचे उदाहरण तर नाही ना घालून देत आहोत, हा अंतर्मुख करणारा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
दुस-याच्या घराला आग लागलेली असताना, आपल्याला त्याची झळ पोहोचत नाही. पण, तीच आग केंव्हा आपल्यालाही गिळंकृत करेल, हे सुद्धा सांगता येत नाही. आपल्या घराघरांपर्यंत ही आग येऊन पोहोचतेय. आत्ताच यावर गंभीरपणे विचार केला नाही, तर प्रश्न फारच गंभीर होऊन जातील. म्हणूनच, वेळीच स्वैराचाराला रोखून, स्वातंत्र्याची पताका अभिमानाने पुढच्या पीढीच्या हाती सोपवायची असेल, तर स्वतःमध्येच छोटे छोटे बदल घडवून आणूया आणि देश घडवूया...!!!
जयहिंद.
दि. १५ ऑगस्ट २०१५.
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!
धन्यवाद.
प्रा. गुरुराज गर्दे.
"महाराष्ट्राचे शैक्षणिक पुनःनिर्माण प्रकल्प ".
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.
माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/
What's Up :- 9422058288
Email :- gururajgarde@gmail.com |aaryaads@yahoo.com
Facebook Link :- www.facebook.com/EduStudentCounselor
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!
No comments:
Post a Comment