Friday, September 11, 2015

"क... क... करिअरचा"



लेखांक १. 
"क... क... करिअरचा"

नमस्कार मित्रहो,

             आपण आजपासून एका नवीन माहिती सदराला सुरुवात करत आहोत. आपल्या आजूबाजूला अनेक मुलं, विद्यार्थी, पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, अनुभवी आणि अननुभवी उमेदवार जॉब शोधात पायपीट करताना दिसतात. अनेक विद्यार्थी करिअरच्या शोधात असतात, अनेक विद्यार्थी करिअरविषयी अनभिज्ञ असतात, उदासीन असतात, काही कमकुवत असतात तर काही ओव्हरकॉन्फिडन्स बाळगून असतात. काही विद्यार्थी पदवीधर होईपर्यंत स्वतःतील व्यक्तिमत्व विकासाकडे दुर्लक्ष करतात, तर काही नोकरीसाठी आवश्यक असणा-या तयारीच्या अभावामुळे, चांगले मार्क्स असूनही मागे पडतात. काहींना नोकरी मिळालेली असते. पण तरीही, ते त्या नोकरीत समाधानी नसतात. काही केवळ नाईलाज म्हणून नोकरी करतात, तर काहींना नाईलाजाने नोकरी मिळते. 
 
              आपल्या भोवती असणा-या आढळणा-या अशा सर्व विद्यार्थी मित्रांना, नोकरीच्या शोधात असणा-या सर्व उमेदवारांना उपलब्ध सर्व क्षेत्रांतील सर्व प्रकारच्या नोकरीच्या संधी माहिती व्हाव्यात, त्यांना त्या त्या क्षेत्रातील नोकरी मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी कराव्या लागणा-या तयारीविषयी, शिक्षणाविषयी आणि प्रशिक्षणाविषयी माहिती, या लेखमालेतून उपलब्ध करून देण्याचा, माझा हा प्रयत्न आहे. 

                  आजवर मला, महाराष्ट्रातील आणि भारतातील पंचवीस हजारांहून (२५०००) अधिक विद्यार्थ्यांशी बोलण्याची, त्यांच्या मनातील जाणून घेण्याची, त्यांचा स्वभाव, अभ्यासतंत्र आणि वर्तणूक यांचे निरीक्षण करून त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. या गेल्या १२- १३ वर्षांतील प्रवासांत मला एक शैक्षणिक समुपदेशक म्हणून, करिअर मार्गदर्शक म्हणून ब-याच गोष्टी या विद्यार्थ्यांना सांगणे, त्यांच्या ध्येयाच्या, करिअरच्या वाटेवरचा सहप्रवासी होणे, त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या आनंदात सहभागी होणे शक्य झाले. महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही, त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी, व्यवसाय किंवा करिअरचे क्षेत्र मिळत नाही, निवडता येत नाही. याला कारणीभूत अनेक घटकांमध्ये योग्य त्या वेळी योग्य ती माहिती न मिळणे आणि योग्य संधी अनावधानाने हातून निसटून जाणे, हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. 

             वेळोवेळी निघणा-या सरकारी, निमसरकारी, आणि खाजगी क्षेत्रांतील नोकरीच्या संधी या ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात राज्य सरकार, शिक्षण विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी आजवर अनेक प्रयत्न केलेत. तरीही मग ही दुरावस्था का संपत नाहीये? शिक्षण घेऊनही नोकरीची ग्यारंटी का मिळत नाही? योग्य ती नोकरी योग्य त्या उमेदवाराला का मिळत नाही? हजारो - लाखो विद्यार्थ्यांनी एवढी वर्षे शिक्षण घेऊन, मेहनत करून, कष्ट करून पाहिलेली स्वप्ने का बरे पूर्ण होत नाहीत? विद्यार्थ्यांच्यामागे लागलेले हे दुष्टचक्र कधी आणि कसे थांबेल?  असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडलेले आहेत.
 
              माझ्या मते, यासाठी शालेय स्तरांवरच, इयत्ता नववी आणि दहावीतच मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्या करिअरचा मार्ग निश्चित करून देणे आणि मग त्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीच्या संधींची काळजी करणे, अधिक सयुक्तिक ठरेल. प्रत्येक वैयक्तिक विद्यार्थ्याने "अजूनही माझी वेळ गेलेली नाही," हे लक्षात ठेवून, आपल्या पालकांना विश्वासात घेऊन, करिअर मार्गदर्शकांकडून ताबडतोब करिअरचे नियोजन करून घ्यावे. दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि नोकरीसाठी उत्सुक, इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर हे करिअर नियोजनाचे महत्त्व ओळखून प्रयत्न सुरु करावेत. म्हणजे, त्यांच्या नोकरीच्या संधी आणि निवड होण्याची शक्यता यांच्या आवश्यक प्रमाणात निश्चित वाढ होऊ शकते. 

               सरकारी, निमसरकारी क्षेत्रांतील नोकरीच्या संधी या जाहीरपणे, सर्वसमावेशक स्तरांवर केल्या जातात. पण खाजगी क्षेत्रातील नोक-यांबाबत मात्र असे होताना दिसत नाही. सरकारी नोक-यांसारखे जाहीर निवेदन किंवा आवेदन प्रत्येक वेळी खाजगी कंपन्यांकडून दिले जाईलच. असे नसते. तर विद्यार्थ्यांनाच त्यासाठी स्वतःला तयार करावे लागते. सरकारी नोकरीच्या संधींच्या मानाने, खाजगी क्षेत्रातील नोक-या मिळवताना करावी लागणारी मेहनत, तयारी आणि गुणवत्ता ही तुलनेने अधिक कष्टकारक असते. पण खाजगी क्षेत्रांत नोकरी करणा-या अनेकांना विदेशगमनाची संधी मात्र अवश्य मिळू शकते. त्यासाठी तुम्हांला अत्यंत कठीण आणि खडतर परिश्रमांची आवशायाकाता असते. सतत नवनवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागते, स्वतःला नेहमी आधुनिक माहितीज्ञानाने सज्ज ठेवावे लागते.

              सरकारी क्षेत्रातील नोकरी ही सर्वाधिक सुरक्षित नोकरी मानली जाते. भविष्यकालीन आणि दीर्घकालीन कायमस्वरूपी, शाश्वत फायद्यांसाठी सरकारी नोकरीसारखे सुख नाही. पण त्यासाठी, विद्यार्थीदशेतच आपल्याला नोकरीच्या वाटेची तोंडओळख होणे, ते करवून घेणे किंवा पालकांनी, शिक्षकांनी आपल्या पाल्याला ती करवून देणे अधिक आवश्यक असते. विविध सरकारी खात्यातील विविध पदांची माहिती आणि भविष्यात उपलब्ध होणा-या संधींची माहिती गोळा करावी लागते. हे सारे करण्यासाठी विद्यार्थ्याने आपल्या पालकांसोबतच शाळा, शिक्षक आणि व्यावसायिक शैक्षणिक समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. शक्य झाल्यास करिअर मार्गदर्शकांकडून आपल्या करिअरचे व्यवस्थित नियोजन आणि मार्गदर्शन ताबडतोब करून घ्यावे. 

              नेहमी करिअर निवडत असताना, आपल्याला आवडत्या आणि झेपेल अशा क्षेत्रांतील चार पर्यायांवर, चार स्तरांवर, पण एकत्रित तयारी लवकरांत लवकर सुरु करावी. जेवढ्या लवकर जागे व्हाल, तेवढ्या लवकर समज येईल. जेवढ्या लवकर समज येईल तेवढ्या लवकर तयारीला लागाल. जेवढ्या लवकर तयारीला लागाल, तेवढ्या लवकर आत्मनिर्भर व्हाल, जेवढ्या लवकर आत्मनिर्भर व्हाल, तेवढ्या लवकर सर्वशक्ती एकवटून सराव, करिअरच्या दिशेने प्रवास सुरु कराल. जेवढ्या लवकर प्रवास सुरु कराल तेवढ्या लवकर, ध्येयापर्यंत, तुमच्या करिअरपर्यंत पोहोचाल. जेवढ्या लवकर तुमच्या ध्येयापर्यंत, करिअरपर्यंत पोहोचाल तेवढ्या लवकर तुमची स्वप्ने पूर्ण होतील. 

                    तुमच्या या करिअर नियोजन आणि करिअर पर्यंतच्या प्रवासांत मी एक मित्र, सखा, मार्गदर्शक, सल्लागार म्हणून सदैव तुमच्या पाठीशी नाही, तर तुमच्या सोबत असेन, हा विश्वास देतो. करिअरविषयी, करिअर नियोजनाविषयी, नोकरीविषयी तुमच्या मनातील कोणतेही प्रश्न, समस्या, शंका, अडचणी असतील, तर फोनद्वारे, What's App द्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून अत्यंत मोकळेपणाने विचारा. 

पुढच्या अंकात पुन्हा नव्या लेखासोबत भेटू, तोवर धन्यवाद.


दि. १२ सप्टेंबर २०१५ 
---- आपला विनम्र,
प्रा. गुरूराज . गर्दे.
शैक्षणिक  समुपदेशक, करिअर  मार्गदर्शक  आणि व्याख्याता. 
"आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट."
कार्यालय -  गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट, 
गावविहिरीच्या समोर, मारुती मंदिर जवळ, 
रायकरमळाधायरी, पुणे४११०४१.
(Off) - 8308138373. | What's Up :- 9422058288
FB Link :- www.facebook.com/EduStudentCounselor

No comments:

Post a Comment